नाशिक : कधीकाळी मराठी माणसाच्या मनात उद्योगधंद्याविषयीची भावनाच मुळी नकारात्मक होती. आज काळ बदलला तसा मराठी माणूसही बदलल्याने उद्योगधंद्यातही तो दिसतो आहे पण हे प्रमाण इतरांच्या तुलनेत नाममात्रच. हे प्रमाण वाढवायचे असेल तर आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यात येण्याचा वेळीच निर्णय घेण्याचे आवाहन करीत कोणताही धंदा करा, त्यात नुकसान नसते पण त्यासाठी हवी जिद्द, मेहनतीची तयारी अन् सकारात्मक मानसिकता, असे प्रतिपादन लोकसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी केले. कालिदास कलामंदिर येथे कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने क. का. वाघ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये डॉ. मनोहर जोशी यांनी ‘मराठी तरुण : व्यापार आणि उद्योजकता’ या विषयातून आपला जीवनप्रवास उलगडला. नांदवी या खेडेगावात सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुरुवातीला महाड आणि नंतर पनवेलला वाराने रहावे लागल्याचे सांगत, मुंबईसारख्या स्वप्ननगरीत वास्तव्यास मिळावे ही सुप्त इच्छा बालपणापासूनच होती. तेव्हाची अन् आजचीही मुंबईची धावपळ सारखीच आहे, माणसांमध्ये फरक पडला आहे एवढेच. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच कामकाजही सुरू असायचे. त्यातूनच मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरी सहा वर्षे केली. त्यादरम्यान, पाच-सहा व्यवसायही केले. फटाके विकले, चंदन-हस्तीदंताच्या वस्तू विकल्या. एवढेच नाही तर चाळीसगावहून दूध खरेदी करून ते मुंबईत वितरितही केले. जिद्द अन् मेहनत घेण्याची तयारी असल्याने मागे न हटता नोकरी सोडून धंद्यातच पूर्णवेळ उतरलो आणि १९६१ मध्ये कोहिनूर कोचिंग क्लास सुरू केला. अवघ्या चार मुलांवर सुरू झालेल्या क्लासमध्ये आज १५ हजारांपेक्षा अधिक मुले शिकतात. सलग १४ तास क्लासमध्ये शिकवणी सुरू असायची. त्यामुळेच कधीकाळी वाराने जेवणारा आज कोट्यधीश झाला, राज्याचा मुख्यमंत्री झाला. ते केवळ स्वप्न न पाहता जिद्द व मेहनत घेतल्यानेच, असेही ते म्हणाले. त्यांना नंदन रहाणे यांनी बोलते केले. यावेळी क. का. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्ती, शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)