नाशिक : सध्या तीन तलाकवरून ज्या चर्चा घडत आहेत त्या पूर्णपणे निराधार व निरर्थक आहेत. तलाकवर वाद-विवादाची गरजच नाही, कारण तलाक मुहम्मद पैगंबरांनाही कधी मान्य नव्हता आणि कुराणालाही मान्य नाही. त्यामुळे तलाकमुक्त समाजाची निर्मिती करणे ही धर्मगुरूंवर नजीकच्या काळात मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कमरुज्जमा आजमी यांनी केले.सुन्नी दावत-ए-इस्लामी संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने शहाजहांनी ईदगाह मैदानावर आयोजित दोन दिवसीय सुन्नी इज्तेमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून आजमी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुन्नी दावते इस्लामीचे अध्यक्ष धर्मगुरू मौलाना शाकीर अली नुरी, खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी, मौलाना मुफ्ती महेबुब आलम, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, मौलाना अमीनुल कादरी, कारी रिजवान खान, मौलाना आसीफ सय्यद, हाजी मीर मुख्तार अशरफी, मौलाना शमशुद्दीन मिस्बाही, मौलाना शाकीर रजा आदि धर्मगुरू उपस्थित होते.