येवला : तालुक्यातील साताळी गावातील दलित-आदिवासीं वस्त्यांमध्ये येत्या ३१ ऑगस्टपर्यंत रोहित्र बसवून सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास, राष्ट्रसेवा दल प्रणित शेतकरी पंचायतचे कार्यकर्ते १ सप्टेंबर रोजी वीज वितरण कंपनीच्या या कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे शेतकरी पंचायतीने दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील चिचोंडी, साताळी, भिंगारे, महालखेडा, नेऊरगाव, निमगाव मढ आदी गावांमध्ये महावितरणचा वीजपुरवठा अनियमित, कमी दाबाने आणि बेभरवशाचा वीजपुरवठा होत आहे. अचानक रोहित्र जळाल्यामुळे पंधरा दिवस वीजच नसल्याचा कटू अनुभव शेतकरी वर्षभरात अनेकदा घेत असतात. एरव्हीही पाच-पाच तास वीज गायब राहण्याचे प्रकार तर बऱ्याच वेळा शेतकरी सहन करतात. वरील गावांपैकी सर्वच गावांमध्ये कमीतकमी तीन ते चार डीपी नव्याने बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्या-त्या गावातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करीत आहेत. मात्र, त्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या मागणीकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात विजेची मागणी वाढली आहे. अर्थात, गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसानेही तब्बल महिन्याभराची ओढ दिल्यामुळे जेमतेम झालेल्या खरिपाच्या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विहिरींमध्ये थोडे-फार पाणी आहे. मात्र, वीज नसल्यामुळे ते पिकांना देता येत नाही, अशा विचित्र कोंडीत शेतकरी सापडला आहे.
मध्यंतरी महावितरणने शेतकऱ्यांचे मेळावे घेतले. दहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केला असून, सिंगल फेजही कट असल्याने साताळी गांव अंधारात आहे. शेतकरी वर्गाला या भयंकर परिस्थितीत दिलासा देण्यासाठी किमान आता कट केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणीही एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रसेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलनात ग्रामपंचायत सरपंच सुनंदा पुंजाराम काळे, माजी सरपंच मच्छींद्र काळे, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब कोकाटे, दिलीपराव काळे, भिकाभाऊ सोनावणे, पंढरीनाथ काळे, भाऊसाहेब जगताप, उपसरपंच गणेश कोकाटे, सुखदेव काळे आदी सहभागी होणार आहेत.