नाशिक : कधी प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांचे हृदगत, कधी रम्य निसर्गाचे वर्णन... तर कधी विरहाच्या वेदनांना मोकळी करून दिलेली वाट... या भावना नव्या शब्दांतून, नवा स्वरसाज लेवून कवितांच्या रूपाने अवतरल्या, तेव्हा रसिकांनाही नवतेची आगळी अनुभूती झाली...डी. आर. डी. कल्चरल फाउंडेशन निर्मित ‘नवे शब्द... नवे सूर’ ही कविता व गीतांची मैफल आज सायंकाळी रंगली. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या मैफलीला श्याम पाडेकर यांच्या शब्दांनी, तर धनंजय धुमाळ यांच्या स्वरांनी ‘चार चॉँद’ लावले. कार्यक्रमात धुमाळ यांनी स्वरबद्ध केलेल्या पाडेकर यांच्या कवितांचे सादरीकरण शहरातील प्रख्यात गायकांनी केले. ‘आला आषाढ महिना’ या अभंगाने मैफलीला प्रारंभ झाला. मोहन उपासनी गायलेल्या या अभंगानंतर डॉ. क्षमा अघोर यांनी ‘फुललेल्या फुलावरी’ गीत सादर केले. लता धुमाळ यांनी ‘गेल्या दिसांची आता मला याद नको’ हे गाणे पेश केले. त्यानंतर ‘पिऊन चांदणे धुंद काजवे’, ‘सोबतीला स्वरांच्या’, ‘एक स्वप्न सजलेले’, ‘मनास माझ्या कधी वाटते’, ‘स्वप्नील डोळ्यांत सुख’, ‘तुझ्या ओठांवरचे गाणे’, ‘चांदणे मोजावयाचे’, ‘खूप काही बोललो तरी’, ‘शब्दांना फसून कोपऱ्यात’ ही गीते झाली. ‘आले भरूनिया डोळे’ या गीताने मैफलीला समारोप झाला. उमेश गायकवाड, भूषण कापडणे, विवेक केळकर, मीना परुळेकर-निकम, रागिणी कामतीकर, विलास म्हसदे, श्रीकांत श्रवण, प्राजक्ता अत्रे, आनंद अत्रे, ज्ञानेश्वर कासार, स्वरांजय धुमाळ, धनंजय धुमाळ, श्रेयसी राय, देवेंद्र शिंदे, निखिल खराडे, गीता माळी यांनी ही गीते गायली. नेहा रत्नपारखी, कांचन गोसावी, संगीता धुमाळ, शीतल कांबळे, परिणिता धुमाळ व साक्षी धुमाळ यांनी कोरसची जबाबदारी सांभाळली. तर रागेश्री धुमाळ, अनिल धुमाळ, श्रुती धुमाळ, विजय धुमाळ (सिंथेसायझर), कृष्णप्रसाद अय्यर (गिटार), स्वरांजय धुमाळ (आॅक्टोपॅड), सतीश पेंडसे (तबला), अमोल पाळेकर (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. श्याम पाडेकर व भूषण कापडणे यांनी निवेदन केले. (प्रतिनिधी)
नव्या शब्द-स्वरांची रसिकांना नवतेची आगळी सुरेल अनुभूती
By admin | Updated: April 22, 2016 23:31 IST