लोहोणेर : कसमादे परिसराचा विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या व चार महिन्यांपासून अंधारात असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी कारखान्याची चाके पुन्हा सुरू करण्यासाठी कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव आदि कार्यक्षेत्रातील वसाकाचे आजी-माजी संचालक, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सोसायटीचे संचालक, ऊस उत्पादक सभासद, कामगार, ट्रक चालक-मालक आदिंचा मेळावा ३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याच्या जनजागृतीचा शुभारंभ गणेश खेडगाव (ता. कळवण) येथील स्वयंभू गणपती मंदिरातून करण्यात आली.वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या चार महिन्यांपासून बंद पडला आहे. वीजदेयके थकल्याने विद्युत प्रवाह खंडित झाल्याने अंधारात आहे. यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर आहेत. वसाका बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांचे हाल होत आहे. वसाकाची चाके पुन्हा फिरविण्यासाठी व त्यासाठी लागणारी उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी वसाका संदर्भातील सर्वच घटकांनी एकत्र बसून एकमताने कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ३ जुलै रोजी ठेंगोडा (ता. बागलाण) येथील दयावान मंगल कार्यालयात दुपारी १ वाजता संयुक्तिक बैठकीचे आयोजन केले आहे. यासंदर्भातील जनजागृती रॅलीत व बैठकीत सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वसाका बचाव शेतकरी मंच कसमादे यांच्या वतीने प्रभाकर पाटील, शिवाजी सोनवणे, रामचंद्र पाटील, दीपक पगार, कैलास बोरसे, गोविंद पगार, कुबेर जाधव, संजय वाघ, कारभारी वाघ आदिंनी केले आहे. (वार्ताहर)’ नाशिक : केंद्र शासनाने रेल्वे भाड्यात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ व सदर भाडेवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले.