इगतपुरी : प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी बेलगाव कुऱ्हे : पावसाळ्यात पाण्यातून पसरणाऱ्या विषाणूजन्य, संसर्गजन्य आजारांमुळे इगतपुरी तालुक्यात विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. उपचारासाठी तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी दिसत आहे.पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. यामुळे डासांची उत्पत्तीही वाढली आहे. डास चावल्याने अनेकांना थंडी, ताप, घसा खवखवणे, खोकला, कणकण, जुलाब अशा साथीच्या आजारांची लागण झालेली आहे. खासगी रु ग्णालयात उपचार महाग असल्याने शिवाय प्रत्येक गावागावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार होत असल्याने अनेक रुग्ण येथेच उपचार घेत आहेत. सध्याच्या वातावरणामुळे डास जास्तच वाढण्याचा संभव असून. यामुळे जीव घेणे आजार डेंगू, स्वाइन फ्लू, मलेरिया सदृश रुग्ण आढळून येण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या घरांमध्ये तसेच परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही यादृष्टीने आवश्यक ती स्वछता ठेवावी. आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, रांजण कोरडे करून तासभर सुकवून त्यानंतर पुनश्च पाणी भरावे. घराभोवती पाण्याच्या हौदात गप्पी मासे सोडावेत. घराच्या सभोवताली पाण्याचे डबके साचू देऊ नये, कुलरमधील व फ्रीजमधील पाणी नियमित बदलावे. परिसरात स्वछता ठेवून डासांची उत्पत्ती होणार नाही या दृष्टीने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. (वार्ताहर)’
विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ
By admin | Updated: August 14, 2016 00:32 IST