कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले छाेट्या-मोठ्या कंपन्या पूर्ववत सुरू झाल्या असून, वसाहतीत कामगारांची वर्दळदेखील वाढली आहे. मात्र अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर रात्रीच्या वेळेस अनेक खांबांवरील दिवे सतत बंदच असल्याने अंधार पसरलेला असतो. या संधीचा फायदा घेत अनेक चोर-लुटारुंनी याभागात रात्री-बेरात्री येऊन एकट्या कामगाराला पाहून त्याला मारहाण करणे, त्याच्याकडील मोबाइल, पैसे व ऐवज लुटणे सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वीच अंबडमधील एका कंपनीतील कामगारांना मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी परतत असताना काही चोरट्यांनी अडवून काही समजण्याच्या आत त्यांना मारहाण करीत चोरट्यांनी मोबाइल व पैसे घेऊन पोबारा केला. जुनी मेल्ट्राॅन कंपनीजवळून एमआयडीसीत जाणाऱ्या रस्त्यापासूनच संपूर्ण रस्त्यावर अंधार असताे. याच परिसरात चोर बऱ्याच वेळा दबा धरून असतात. तसेच ताज हॉटेलमागील रस्त्यावरही रात्री अंधारच असतो.
एमआयडीसीच्या रस्त्यांवर काही ठिकाणी अंधार तर काही ठिकाणी वाढलेल्या झाडांमुळे दिवे असूनही अंधार पसरत असल्याने या अंधारात कामगारांच्या लुटीचे प्रकार वाढत असल्याने रात्रीच्या सुमारास कामगार ये-जा करण्यास भीती व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या हद्दीतील पोलीस ठाणे व रात्रीची गस्त घालणारे पोलीस पथक, कर्मचारी फारसे फिरकत नसल्याने चोरट्यांना ते अधिक फावत असल्याचे कामगारवर्गात बोलले जात आहे.