पावसाळा अवघ्या पंधरा दिवसांवर आला आहे. जय भवानी रोड व सुंदर नगर येथील उघड्या नाल्यात मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असून, झाडे उगवली आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासाचे साम्राज्य वाढले आहे. पावसाळ्यापूर्वी नाशिकरोड परिसरातील उघडे व बंदिस्त नाले, गटारी व चेंबर साफ करण्याची गरज आहे. गटारी व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा घाण साचल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी तुंबून दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर साचण्याची शक्यता आहे. यामुळे साथीचे आजार व रोगराई असण्याची शक्यता आहे.
मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावसाची वाट न बघता पावसाळ्यापूर्वी गटारी व नाले स्वच्छ करण्याची गरज आहे. पावसाळ्यात पाण्याच्या तडाख्याने आपोआप गटारी, नाले यामधील घाण वाहून जाऊन स्वच्छ होऊन जातात. त्यानंतर मनपा बांधकाम व आरोग्य विभागाकडून गटारी व नाले स्वच्छ करण्याचे काम हाती घेतल्याचा दिखावा करून ठेकेदाराला बिले अदा केली जातात. यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून, मनपा प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील उघडे व बंदिस्त नाले, गटारी, चेंबर स्वच्छ करण्याची गरज आहे. तसेच रस्त्यामधील भूमिगत गटारीचे बुजून गेलेले चेंबरदेखील स्वच्छ करण्याची गरज आहे.