नाशिक शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर सर्वांत लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला असला तरी, शहरांतर्गत वाहतुकीसाठी वाहनचालकांना पुलाखालील राष्ट्रीय महामार्ग व समांतर रस्त्याशिवाय पर्याय नाही, परिणामी या रस्त्यावरील वर्दळ कायम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला की, रस्ता वाहन चालविण्यासाठी धोकेेदायक ठरू लागला असून, गेल्या आठवड्यात पंचवटीतील आडगाव नाका, दंत महाविद्यालय या भागात चिखल व पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहने घसरण्याची घटना घडल्याने अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने अग्निशामक बंबाच्या साहाय्याने सदरचा रस्ता धुवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अल्पकाळ ठरला. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने उड्डाणपुलाखाली ज्याठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ता धुतला जातो त्याठिकाणी हा प्रकार घडत नाही, मात्र ज्या ठिकाणी पाणी पडत नाही, अशा ठिकाणी वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. पुलाखाली व आजूबाजूला असलेल्या शोभिवंत झाडांची माती पावसामुळे रस्त्यावर वाहून येत असल्यामुळेदेखील हा प्रकार सुरू असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यामुळे पंचवटीतील स्वामी नारायण चौकीसमोर उड्डाण पुलाखालील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून समांतर जोड रस्त्याने वाहतूक वळविली. त्याच प्रमाणे द्वारका चौकाच्या पुढे वडाळानाका चौफुलीवरून रस्ता बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे. मुंबई नाक्याकडून इंदिरानगरकडे जातांनादेखील हाच प्रकार घडत असल्याने तेथेही बुधवारी रात्रीपासून रस्ता बंद करून समांतर रस्त्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे समांतर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. त्यातल्या त्यात मुंबई नाका, द्वारका चौक व आडगाव नाका येथे वाहनांच्या रांगा लागत असून, या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
चौकट=
कायमस्वरूपी उपाययोजना करू
महामार्गावर वाहन घसरण्याचे प्रकार पाहता, ज्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत, तेथील रस्ता पाण्याने स्वच्छ धुण्यात येत आहे तसेच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर चरे मारण्यात आले असून, काही रासायनिक प्रक्रिया करून हा प्रकार टाळण्याचाही प्रयत्न केला गेला; परंतु नवीन ठिकाणी हा प्रकार घडत असल्याने तूर्त पाऊस सुरू असल्यामुळे रस्ता बॅरिकेडिंगने बंद केला आहे. तथापि, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञांकडून सल्ला व शोध घेतला जाईल.
- दिलीप पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण