नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून होणार होणार म्हणून कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या जिल्हा परिषद मुख्यालयातील बहुचर्चित पाच वर्षांहून अधिक कार्यकाळ झालेल्या ४० कर्मचाऱ्यांच्या विभागात बदल करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र यातूनही कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक या संवर्गांना वगळण्यात आल्याने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सुरू झाला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांना व प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आवश्यक ते कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. त्यातच एकाच विभागात व एकाच टेबलवर तीन ते पाच वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन वर्षांनंतर टेबल, तर पाच वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांचे विभाग बदलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा सुखदेव बनकर यांनी केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात आता आॅगस्टमध्ये अंमलात आली. चाळीस कर्मचाऱ्यांचे खांदेपालट अर्थात विभागात बदल करण्यात आले असून, त्यात कनिष्ठ सहायक- १६, वरिष्ठ सहायक- ५, कनिष्ठ सहायक लेखा- २, वरिष्ठ सहायक लेखा- १३, कनिष्ठ लेखाधिकारी- २ व सहायक लेखाधिकारी- २ अशा एकूण ४० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातही काढण्यात आलेल्या आदेशात काही कर्मचाऱ्यांच्या विभागात अंशत: बदल करण्याचीही तत्परता प्रशासनाने दाखविल्याचे कळते. विशेष म्हणजे, अंतर्गत बदलाची कार्यवाही करून काही तास उलटत नाही तोच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना ठरावीक कर्मचाऱ्यांना आहे त्याच जागेवर ठेवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींच्या ‘शिफारशीही’ तत्परतेने आल्याचे कळते. (प्रतिनिधी)
मुख्यालयातील ‘चाळीस’ कर्मचाऱ्यांची खांदेपालट
By admin | Updated: August 13, 2014 00:40 IST