नाशिक : द्राक्ष उत्पादकांच्या आणि निर्यातक्षम द्राक्षबागांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर यंदा द्राक्षांची विक्रमी निर्यात होईल असे वाटत असतानाच झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. त्या गारपिटीचा फटका बसून मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्षनिर्यातीत सुमारे १० टक्के घट झाल्याचे अपेडाची आकडेवारी सांगते. त्यामुळे २० मार्चपर्यंत यंदा ३६०७८ मेट्रिक टन म्हणजेच २८३२ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली आहे.मागील वर्षी राज्यातून २९ मार्चपर्यंत ३९२३१ मेट्रीक टन म्हणजेच ३०६३ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा आत्तापर्यंत केवळ २८३२ कंटेनरची निर्यात झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे ३२०० मेट्रीक टनांची घट झाली आहे. यंदा द्राक्षांचे उत्पादन आणि निर्यात दोन वर्षांच्या तुलनेत चांगली राहील असे वाटत होते. उत्पादनही तसेच आले होते. निर्यातक्षम द्राक्षांना परदेशात ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो आहे. त्याची विक्री परदेशी व्यापारी भारतीय चलनानुसार २०० ते २५० रुपये किलोने करतात. आणखी किमान महिनाभर द्राक्षांचा हंगाम चालू राहणार असून, मागच्या वर्षीचे निर्यातीचे रेकॉर्ड तुटेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. युरोप, चीन, चिली, दक्षिण आफ्रिका यांसह इतर देशांमधील द्राक्षांचा दर्जा भारतीय द्राक्षांपेक्षा चांगला आणि वाहतूक खर्च आपल्या खर्चाच्या तुलनेत केवळ २५ टक्केच असल्याने त्यांच्या उत्पादनाला चांगली मागणी असते. असे असले तरी त्याची उत्पादन क्षमता भारतापेक्षा कमी असल्याने परदेशी द्राक्षांच्या उत्पादनानंतरही भारतीय द्राक्षांची परदेशातील मागणी कायम राहाते. एकूण निर्यात ४००० कंटेनरपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. द्राक्षांच्या निर्यातीत सुमारे ७५ टक्के वाटा एकट्या नाशिक जिल्ह्याचा असतो असे आकडेवारीवरून दिसून येते. नाशिक जिल्ह्यातून मार्जअखेर एकूण सुमारे २२०० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत तेही घटले आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात जर वातावरण चांगले राहिले तर निर्यात मागील वर्षीचा स्तर पार करू शकते आणि ओलांडू शकते असाही अंदाज लावला जातो आहे. (प्रतिनिधी)
गारपिटीने द्राक्षनिर्यातीला तडाखा
By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST