शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

गोदावरीत खळाळला ‘भक्तीचा प्रवाहो’

By admin | Updated: September 13, 2015 23:18 IST

महाकुंभपर्वणी : लक्षावधी भाविकांचे पुण्यस्नान, आखाड्यांच्या मिरवणुकीची ‘शाही’ अनुभूती

नाशिक : ‘गंगा गोदावरी महाभागे, महापापविनाशिनी’...पापांचा नाश करणारी गोदावरी मोक्षाचे सुलभ साधन मानली गेली आहे आणि हाच श्रद्धाभाव मनी साठवत सिंहस्थ कुंभमेळ्यातील श्रावणी अमावास्येला आलेला महापर्वकाळ साधत भरतभूवरील विविध प्रांतांसह सातासमुद्रापलीकडून आलेल्या लाखो भाविकांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरी गोदास्नानाचा विलक्षण धर्मसोहळा अनुभवला. आत्मशुद्धी व आत्मकल्याणाची अनुभूती देणारा आणि धर्मरक्षणाची द्वाही त्रिखंडात फिरवणारा कुंभपर्वाचा मंगलसोहळा विविध आखाडे व खालशांच्या ‘शाही’ मिरवणुकीने तर आणखीच शुभंकर झाला. महापर्वणी निर्विघ्न पार पडल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. शनिवारी पिठोरी अमावास्येला लक्षावधी भाविकांनी गोदाघाटावर स्नानासाठी गर्दी केल्याने आणि पावसानेही धुवाधार हजेरी लावल्यानंतर पर्जन्यसंकट असलेल्या महापर्वणीला भाविकांची संख्या घटण्याचा अंदाज श्रद्धाळू भाविकांनीच फोल ठरविला. शनिवारी मध्यरात्रीपासूनच रामकुंड व कुशावर्त तीर्थाकडे आगेकूच करणाऱ्या भाविकांच्या गर्दीने रस्ते ओसंडून वाहत होते. गोदातटी लोटलेला हा आस्थेचा महापूर अनेकांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त तर झालाच शिवाय नाशिककरांनीही तो काळजात साठविला. भाविकांचा ओघ सुरू असतानाच नाशकात तपोवनातील साधुग्राममध्ये सकाळी ६ वाजेच्या सुमारास साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. द्वितीय शाहीस्नानासाठी निर्मोही आखाड्याला अग्रभागी मान होता. त्यानंतर मधोमध दिगंबर अनी आखाडा आणि सर्वात शेवटी निर्वाणी अनी आखाडा सहभागी झाला होता. फुलामाळांनी सजविलेल्या वाहनांतून निघालेल्या या मिरवणुकीतून शाहीमार्गावर दुतर्फा जमलेल्या भाविकांनी महात्म्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.४५ वाजता निर्मोही आखाड्याचे रामकुंडावर आगमन झाले. यावेळी धर्मध्वज व निशाण तसेच इष्टदेवता पवनपुत्र हनुमानाची पूजा करत आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास, महंत अयोध्यादास महाराज तसेच षष्ठयपीठाचे वल्लभाचार्य स्वामी वल्लभराय यांनी गोदास्नान केले. ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो’, ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘पवनपुत्र हनुमानकी जय’ या नामघोषात आणि ढोल-नगाऱ्यांच्या गजरात आखाड्यांबरोबर त्यांच्यासमवेत असलेल्या खालशांतील साधूंनी गोदास्नान करत महापर्वणीचा पुण्यकाळ साधला. निर्मोहीनंतर दिगंबर अनी आखाड्याचे सकाळी ८.४५ वाजता रामकुंडावर आगमन झाले. यावेळी विधीवत पूजा झाल्यानंतर आखाड्याचे श्रीमहंत कृष्णदास महाराज, चतु:संप्रदायाचे महंत बर्फाणीदादाजी महाराज, महंत रामकिशोरशास्त्री महाराज, डाकोर इंदोर खालशाचे गाद्याचार्य माधवाचार्य महाराज, महंत भक्तिचरणदास यांनी गोदास्नान केले. नंग्या तलवारी उंचावत आणि जटांचे प्रदर्शन करत साधूंनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी दुग्धाभिषेक करत गोदामाईला नमन करण्यात आले. सर्वात शेवटी ९.२० वाजता निर्वाणी अनी आखाडा रामकुंडावर आल्यानंतर आखाड्याचे श्रीमहंत ग्यानदास महाराज यांनी भाविकांना हात उंचावून अभिवादन केले आणि गोदास्नानाचा पुण्यकाळ साधला. त्यांच्यासमवेत निर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष महंत धरमदास महाराज, चतु:संप्रदायाचे फुलडोलदास बिहारी, खाकी आखाड्याचे महंत जगन्नाथदास महाराज, निम्बार्कचार्य श्री जी महाराज आदिंनी गोदास्नान केले. तीनही आखाडे आपापले स्नान करत परतीच्या मार्गाने साधुग्रामकडे मार्गस्थ झाले. तीनही आखाड्यांच्या इष्टदेवता पूजाविधीचे पौरोहित्य दिनेश गायधनी, विनायक गायधनी, गजानन गायधनी आदि ब्रह्मवृंदांनी केले. दुपारी १२ वाजेपर्यंत विविध खालशांतील साधू-महंत यांचे गोदास्नान सुरु होते. त्यानंतर प्रशासनाने गर्दीचा अंदाज लक्षात घेत भाविकांना स्नानासाठी रामकुंड खुला केला. नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वरीही शैव पंथीयांच्या दहाही आखाड्यांने नियोजित क्रमवारीनुसार कुशावर्त तीर्थावर गोदास्नान केले. त्र्यंबकेश्वर येथे पहाटे ३ वाजता आखाड्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत नागा साधूंचे शिस्तबद्ध संचलन भाविकांचे आकर्षण ठरले. पहाटे ४ वाजता सर्वप्रथम पंचायती श्री निरंजनी आखाड्यातील साधू-महंतांनी स्नान केले, तर सर्वात शेवटी सकाळी १० वाजता श्री निर्मल पंचायती आखाड्याने गोदास्नान केले. त्यानंतर कुशावर्त भाविकांना खुले करुन देण्यात आले. पहिल्या पर्वणीला (दि. २९ आॅगस्ट) पोलीस प्रशासनाच्या अतिरेकी बंदोबस्ताचा परिणाम भाविकांची संख्या घटण्यात झाला होता. प्रशासनाच्या या नियोजनावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर पोलिसांनी फेरनियोजन करत महापर्वणीला बंदोबस्ताचा विळखा सैल केला होता. त्यामुळे भाविकांना विनासायास गोदाघाटाकडे मार्गक्रमण करता आले. याशिवाय शहरांतर्गत बस व रिक्षा यांच्या माध्यमातून वाहतूक सेवाही कार्यरत ठेवल्याने भाविकांची पायपीट कमी झाली. साधू-महंतांच्या स्नानाबरोबरच लाखो भाविकांनी रामघाटावर हजेरी लावत गोदास्नानाची महापर्वणी साधली. वरुणराजाला साकडेराज्याचे जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी तीनही आखाड्यांच्या साधू-महंतांचे स्नान होत असताना रामकुंडावरच ठाण मांडत प्रसंगी पाण्यात उतरत स्वत: गर्दी नियंत्रण करण्याचीही भूमिका बजावली. आखाड्यांचे स्नान आटोपल्यानंतर पालकमंत्र्यांनी सपत्नीक गोदास्नान केले. यावेळी माध्यमांशी बोलताना महाजन यांनी सांगितले, राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे मी गोदामाईकडे वरुणराजाला खूप बरसण्याचे साकडे घातले आहे. पहिल्या पर्वणीला आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या दुरुस्त करत फेरनियोजन करण्यात आले आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघता मी पूर्ण समाधानी आहे. नाशिक व त्र्यंबक मिळून सुमारे ६० लाख भाविकांनी हजेरी लावल्याचा दावाही महाजन यांनी केला.