सतीश डोंगरे नाशिक ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रिद घेऊन दुर्गम भागापर्यंत पोहोचलेल्या अन् आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थिसंख्या असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाने बाय‘पास’ केल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. याबाबत काही अभ्यास केंद्र संचालकांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्याने आता विद्यापीठ प्रशासनाकडून एसटी महामंडळाची मनधरणी केली जाणार असल्याचे समजते. समाजातील सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाने भारंभार अभ्यासक्रम सुरू केले. शहरी भागातच नव्हे, तर दुर्गम भागातही विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळणे अपेक्षित आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळाने या विद्यार्थ्यांना एसटीचा सवलतीचा पास नाकारल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एसटी विद्यार्थ्यांसाठी खास मासिक पाससाठी सवलत देते. त्यात तांत्रिक, व्यावसायिक आणि अन्य शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. पाचवीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी पासचे लाभार्थी आहेत. एसटीने कोट्यवधी रुपयांची सवलत दिली असून, सन २०१२-१३ मध्ये ९ कोटी ७९ लाख ५१ हजार २०० रुपयांची, तर सन २०१३-१४ मध्ये सप्टेंबरअखेर १२ कोटी २७ लाख ५० हजार ७४० रुपयांची सवलत दिली आहे. लाभार्थींत तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार ७०९ इतकी आहे. परंतु यामध्ये मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नसल्याने त्यांनाही एसटीची सवलत मिळावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. दरम्यान, याबाबत एसटी प्रशासनाला विचारले असता त्यांनी अनुदान असलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व २४ वर्षांआतील विद्यार्थ्यांनाच महामंडळाच्या एसटी पास या योजनेचा लाभ घेता येऊ शकत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी हे नोकरी किंवा व्यवसाय करून शिक्षण घेणारे असल्याने त्यांन्+ाा महामंडळाकडून सवलत देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचे कारण देत पास नाकारल्याचे समजते. तर राज्य परिवहन महामंडळाच्या या भूमिकेबाबत अभ्यास केंद्र संचालकांकडून विरोध दर्शविला जात असून, महामंडळाने सर्वच विद्यार्थ्यांना पासेस देण्याची गरज असल्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाने पासेस द्यावे याकरिता पाठपुरावा केला जाणार आहे. मुक्त विद्यापीठात नोकरी अथवा व्यवसाय करून शिक्षण घेणे शक्य असल्याचे कारण सांगत महामंडळ विद्यार्थ्यांना पास नाकारत आहे; परंतु आदिवासी दुर्गम भागातदेखील विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने त्यांना महामंडळाने सवलतीचा पास देणे अपेक्षित आहे. - डॉ. प्रकाश अतकरे, कुलसचिव, मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाकडून प्रायोगिक तत्त्वावर अनेक अभ्यासक्रम चालविले जातात; मात्र शासननियमाप्रमाणे या विद्यार्थ्यांना सवलतीचा पास देणे शक्य नाही. कारण जेव्हा महामंडळाकडून विद्यार्थ्यांना पास दिला जातो, तेव्हा दहा टक्केच रक्कम विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. उर्वरित रक्कम शासन कोट्यातून जमा होते. त्यामुळे लेखापरीक्षण करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. - व्ही. एस. गणोरे, वाहतूक निरीक्षक