त्र्यंबकेश्वर :
गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वरला पावसाची संततधार सुरू असुन बुधवारी (दि. २१) दिवसभरात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११४ मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात ४४४ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यात ७२५ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या संततधारेमुळे शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील तेली गल्ली, गोकुळदास लेन, मेनरोड कुशावर्त परिसरात पूरसदृश स्थिती होती. काही घरांमध्ये पाणी शिरले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अमृतकुंभ धर्मशाळेसमोर, नगरपरिषद कार्यालयासमोर पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या वर्षी मृगनक्षत्र सुरू होण्याअगोदर मोसमपूर्व पाऊस जोरदार बरसून शेतकऱ्यांना पेरणी करण्यास
उद्युक्त केले होते. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण नंतर पावसाने ओढ दिली. आता गेल्या चार दिवसांपासून पावसाने संततधार धरली आहे. त्यामुळे गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे घोटी रस्त्यावर कोजुली गावात देवीदास भिवा पोटकुळे यांच्या घराची पडझड झाली. दरम्यान, शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.