नाशिक : अंबड-लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढाई लढली आणि शनिवारी दातीर यांच्या लढ्याला प्रत्यक्ष यश आले. दातीर यांना शिवसेनेचेही मनोबल लाभले. मात्र, सदर भंगार बाजार वाचविण्यासाठी भाजपा व कॉँग्रेसच्या नेत्यांनी शेवटपर्यंत ‘खो’ घालण्याचे प्रकार उघड झाल्याने त्याचा परिणाम दोन्ही पक्षांवर आगामी महापालिका निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंबड-लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजाराने शहरातील कायदा व सुव्यवस्थेला नेहमीच आव्हान दिले. भंगार बाजार परिसरात गुन्हेगारांना आश्रय दिला जात असल्याचेही पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील संशयिताच्या अटकेने समोर आले. याशिवाय, चोरीचा मालही या भागातून अनेकदा हस्तगत करण्यात आला. दिवसाढवळ्या या भागातून महिलांना एकटे जाणे धोकेदायक मानले जात होते. त्यामुळे भंगार बाजारविरुद्ध नाशिककरांमध्ये कमालीचा रोष होता. त्यामुळेच सदर भंगार बाजार हटविण्यासाठी १९९५ च्या सुमारास भंगार बाजार विरोधी कृती समितीची स्थापना झाली. मात्र, या भंगार बाजार हटविण्याच्या कृतीला जुलै २००७ पासून खऱ्या अर्थाने वेग घेतला. सन २००७ च्या निवडणुकीत सेनेचे दिलीप दातीर महापालिकेत निवडून गेले आणि त्यांनी पहिल्यांदा भंगार बाजारविरोधी उघडपणे भूमिका घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निकाल मनपाच्या बाजूने लागूनही प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याने शिवसेनेने तत्कालीन आयुक्त विलास ठाकूर यांच्या निवासस्थानासमोर रास्ता रोकोही केला होता. मध्येच सन २०१० मध्ये राज्य शासनाकडूनही स्थगितीचे आदेश आले. त्यामुळे दातीर यांनी जानेवारी २०११ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दातीर यांनी तब्बल दहा वर्षे न्यायालयीन लढाई लढली आणि अखेर न्यायालयाने दातीर यांच्या बाजूने निकाल देत भंगार बाजार हटविण्याला हिरवा कंदील दाखविला. दातीर यांच्या या लढ्याला शिवसेनेचेही बळ लाभले. मात्र, गेल्या काही दिवसांत भंगार बाजार हटविण्याची कारवाई निश्चित होताच भाजपा आमदारांकडून दबावाचे राजकारण सुरू झाल्याची तक्रार दिलीप दातीर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली, तर साक्रीच्या कॉँग्रेस आमदाराचे बनावट पत्राचा घोळ समोर आल्याने कॉँग्रेसचाही सहभाग उघड झाला. बहुचर्चित भंगार बाजार हटविण्याचे श्रेय सेनेकडे जात असल्याने येत्या महापालिका निवडणुकीत सेनेकडून या प्रकरणाचा लाभ उठविला जाईल तर भाजपा व कॉँग्रेसला मतदारांना उत्तर देताना दमछाक होणार आहे.
दातीरांचा लढा, सेनेचे बळ अन् भाजपा-कॉँग्रेसचा खो‘
By admin | Updated: January 8, 2017 01:32 IST