घोटी : मुंबई ते नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला इगतपुरी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा होणारा कडवा विरोध लक्षात घेऊन त्यांचा विरोध दूर करण्यासाठी शासनाने बोलावलेल्या विशेष ग्रामसभेतही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडवा विरोध केला, तर शेणवड बु. येथील ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याने मतपरिवर्तन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. शेतकऱ्यांचा होणारा विरोध मावळण्यासाठी व मतपरिवर्तन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव मोर, उभाडे, देवळे, खैरगाव, शेणवड बु., कांचनगाव, औचितवाडी, तळोघ व तळोशी या तेरा गावांत एकाच दिवशी विशेष ग्रामसभेचे शासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. मात्र या ग्रामसभेतही उपस्थित अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचे ठणकावून सांगत आपला विरोध कायम असल्याचे ठामपणे सांगितले. तर शेणवड बु. येथील ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याने अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची एक तास वाट पहावी लागली. मात्र ग्रामस्थ न आल्याने अधिकारी ग्रामसभेविना माघारी फिरले. (वार्ताहर)
जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध
By admin | Updated: January 1, 2017 22:55 IST