येवला : कांदा- बटाटा या नगदी पिकांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना धक्का देणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. कांद्यामुळे सरकार गडगडू शकते असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला .कांदा-बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूत समावेश केल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे गुरुवार दुपारी रेल्वे रोको आंदोलनाच्या पूर्वसंध्येला येवला विश्रामाग्रहात जोशींनी आक्रमक भूमिका मांडत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या नाही. मोदी सरकारनेही अपेक्षाभंग केला. कांदा-बटाटे या महत्त्वाच्या पिकांचा जीवनावश्यक यादीत समावेश करून उत्पादन साठवणूक, प्रक्रियेवर बंधने घातली. जीव वाचवणाऱ्या औषधांचा जीवनावश्यक यादीत समावेश नाही. पण कांद्याला जीवनावश्यक केले. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालावली असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्याना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेतला आहे. तो शेतकरी संघटनेला मान्य नाही. त्यासाठीच आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लासलगावच्या रेल रोको आंदोलनात सर्व रेल्वे थांबवण्यात येणार असून दिल्ली सरकारला त्यामुळे जाग येईल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे अनंत देशमुख, संतू पा.झांबरे, सुभाष सोनवणे, निवृत्ती जगताप, चंद्रभान बोराडे, दत्तात्रय गायकवाड, अशोक गिडगे, संध्या पगारे, माणिकराव सूर्यवंशी, अभिमन्यू काळे, शिवाजी भालेराव, पोपट काळे उपस्थित होते.