बागलाण तालुक्यातील फोफीर, बिजोटे, कोळीपाडा, बिजोरसे, रामतीर, नवे नीरपूर येथील शेतकऱ्यांनी शहरातील एका बँकेच्या कर्मचाऱ्याकडून आपली फसवणूक झाली असून, आपल्याला न्याय मिळावा व संबंधितांवर कारवाई करावी अशी लेखी तक्रार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. अर्जासोबत बनावट पावत्या, बोगस नील दाखले व सातबारेदेखील जोडले आहेत. मात्र याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने सोमवारी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेच्या कार्यालयावर हल्लाबोल केल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी हस्तक्षेप करून दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सटाणा पोलिसांत धाव घेतली. मात्र कारवाईसाठी पुरेशी कागदपत्रे सादर न केल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
पीककर्ज फसवणूकप्रकरणी शेतकऱ्यांचा बँकेवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST