लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी भगवान गीताराम बोडखे (३२) या तरुण शेतकऱ्याने ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील या सप्ताहातील ही दुसरी आत्महत्या आहे.या शेतकऱ्याकडे चार एकर शेती असून, त्याच्यावर बोलठाण विविध कार्यकारी सोसायटीचे दोन लाख ८० हजार रुपये, तर खासगी सावकारांचे व इतर तीन लाख रुपयांचे कर्ज होते. बँक आॅफ इंडियात असलेल्या बचत खात्यातून खासगी देणेदारी मिटविण्यासाठी आणि १६ मे रोजी असलेल्या भाचीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याच्या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. बँक आॅफ इंडियामध्ये त्याचे बचत खाते होते. त्या खात्यात ४० हजार रुपये होते, मात्र नोटाबंदीनंतर व चलन तुटवड्यामुळे ते मिळणे मुश्कील झाले होते. कर्जामुळे हे खाते बॅँकेने सील केले असल्याचे सांगण्यात आले. या शेतकऱ्याचे पितृछत्र १० वर्षांपूर्वी हरपले असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
गोंडेगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: May 13, 2017 02:19 IST