सटाणा : शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत सन २०१३-१४ मधील पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांंचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत सरकारने मुदतवाढ दिली आहे.राज्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा बँक व ग्रामीण बँकामार्फत खरीप व रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून जाते. या योजनेंतर्गत दरवर्षी चाळीस हजार कोटी रु पये शेतकऱ्यांना वाटप केले जातात. जे शेतकरी ३० जूनपर्यंत पीक कर्जाची परतफेड करतील त्यांना राज्य सरकार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत तीन टक्के व्याजाची सवलत देते.ही रक्कम राज्य सरकार बँकांना अदा करते. कमी व्याजदरामुळे शेतकरीही मुदतीत कर्ज भरतात व बँकाचीही वसुली होण्यास मदत होते. यंदा मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीव्यवसाय उद्ध्वस्त झाला. त्यामुळे सन २०१३-१४ या वर्षातील ३० जूनपर्यंत कर्ज वसुलीचे प्रमाण कमी आहे. पीककर्जाची वेळेवर परत फेड न झाल्यामुळे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार होता. राज्य सरकारने योजनेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे व्याज सवलतीचा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पीक कर्जाला मुदतवाढ
By admin | Updated: August 15, 2014 00:34 IST