नाशिक : वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्जन्यमान कमी होऊन भीषण दुष्काळासारख्या समस्यांचा सामना करावा लागत असतानाही अनेक सुशिक्षित कुटुंबे आपल्या घरासमोर झाड नको म्हणतात. त्यामुळे दिवसेंदिवस वृक्षांची संख्या घटत असल्याने ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात उमटला. भारतीय माजी सैनिक संघटना, पर्यावरण संतुलन संस्था व स्वातंत्र्य सैनिक संघटना यांनी संयुक्तरीत्या रविवारी (दि.५) हुतात्मा स्मारक येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष फुलचंद पाटील, पर्यावरण संतुलन संस्थेचे अध्यक्ष रमेश कडलक, सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर, स्वातंत्र्यसैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष पंडित येलमामे व सुरेश जैन आदि मान्यवरांनी त्यांचे मत मांडले. पर्यावरण रक्षणाचे महत्त्व विशद करताना चंद्रकांत लासुरे यांनी पक्षांसाठी पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पंडित येलमामे यांनी वृक्षलागवड व संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. ज. रा. पाटील यांनी पर्यावरणाविषयी कविता सादर केली. ग्लोबल वार्मिंग, वाढलेले प्रदूषण, प्रचंड वृक्षतोडीमुळे घटलेले पर्जन्यमान व खालवलेली भूगर्भजल पातळी यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे पां. भा. करंजकर यांनी सांगितले. प्रा. यशवंत पाटील यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ या अभंगाच्या आधारे पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष विजय पवार, सचिव मेघश्याम सोनवणे, सहसचिव पी. यू. चौधरी, डॉ. साहेबराव कासव, चंद्रशेखर कांबळे, प्रकाश मेधने, सोपान मुसळे, अॅड. शिवाजी शिवर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वृक्षलागवडीने पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता
By admin | Updated: June 5, 2016 22:23 IST