नाशिक : निवडणूक आयोगाने २९ मेपासून निरंतर मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी, निवडणूक शाखेत काम करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याने मनुष्यबळाअभावी ही प्रक्रिया यशस्वी करण्याचे मोठे आव्हान अधिकार्यांसमोर ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक कामासाठी निवडणूक शाखेने अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांची सेवा वर्ग करून घेतली होती. त्यामुळे मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविणे शक्य झाले होते. आता निवडणूक आटोपल्यावर वर्ग केलेले कर्मचारी पुन्हा त्यांच्या मूळ सेवेत दाखल झाले. अशा परिस्थितीत मतदार नोंदणी मोहीम राबविणे अवघड होऊन बसले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात आलेली असली तरी, त्यांना पुरेशी साधनसामग्री वा कर्मचार्यांची वानवा आहे. कार्यालयात साधे शिपाईही नसल्यामुळे या अधिकार्यांना स्वत:च ही कामे करावी लागतात. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याने त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता, त्यासाठी अतिरिक्त कर्मचार्यांची गरज भासणार आहे. परंतु निवडणूक शाखेत काम करण्यास कर्मचारी नाखूश असल्याने ते कसे पार पाडावे असा प्रश्न अधिकार्यांना पडला आहे.
मतदार नोंदणीसाठी कर्मचार्यांचे संकट
By admin | Updated: May 25, 2014 20:35 IST