नाशिक : महापालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकारावी प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरीत मंगळवारी (दि. ३१) सायंकाळपर्यंत ८ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत ७ हजार ९८८ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेले असताना तब्बल ८९० अतिरिक्त जागांवर प्रवेश निश्चित झाल्याने विद्यार्थ्यांचा यावर्षी पहिल्या फेरीपासूनच द्वितीय पसंती क्रमाच्या महाविद्यालयांमध्येही प्रवेशाकडे कल असल्याचे दिसून येत आहे.
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याची सोमवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेवटची मुदत होती परंतु पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांचा तांत्रिक घोळ उडाल्याने तसेच प्रवेश प्रक्रियेपासून पात्र उमेदवार वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ दिली होती. ही मुदत मंगळवारी सायंकाळी संपली असून अकरावीत आतापर्यंत ८ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. त्यामुळे दरवर्षी पहिल्या फेरीपासूनच पूर्ण क्षमतेने प्रवेश होत नसल्याने रेंगाळणारी प्रवेश प्रक्रिया यावर्षी लवकरत पूर्ण जागांवर प्रवेश निश्चित होऊन पूर्ण होण्याचे संकेत निर्माण झाले आहे.
अकरावी प्रवेशाची स्थिती
कनिष्ठ महाविद्यालये - ६०
उपलब्ध जागा - २५,३८०
एकूण अर्ज - २३,१५८
अर्जांची पडताळणी -२०,९००
पर्याय निवडले -१६,७५२
प्रवेश निश्चित - ८८७८
रिक्त जागा -१६५०२