वणी : भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटीच्या वणी शाखेने अल्पबचत ठेवीदारांना दिलेले धनादेश न वटल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या अडीच महिन्यांपासून आर्थिक अनियमिततेमुळे बीएचआर वणी शाखेचे ठेवीदार हतबल झाले आहेत. ठेवीदारांनी रेटा लावल्याने प्रारंभी अल्पबचत ठेवीदारांना त्याच्या रकमांचे धनादेश वाटप करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील अॅक्सीस बँक शाखेचे सदर धनादेश ५ आॅगस्ट २०१४ या तारखांचे होते. या धनादेशावर वैशाली पाटील व दिनेश चौधरी मुख्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र सदर धनादेश ठेवीदारांनी वटविण्यासाठी बँकेत भरले असता खात्यात रकमेअभावी ते वटू शकले नाहीत. बीएचआरच्या या खात्यामध्ये मात्र २६९ रुपये एवढीच शिल्लक असल्याची माहिती ठेवीदारांना मिळाल्याने ठेवीदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अल्पबचत ठेवीदारांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत तर मुदत ठेव योजनांमध्ये गुंतविलेल्या ठेवीदारांच्या रकमांचे काय, असा प्रश्न आता ठेवीदारांसमोर उभा ठाकला आहे. (वार्ताहर)
रायसोनी बँकेचे धनादेश न वटल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ
By admin | Updated: August 13, 2014 00:40 IST