नाशिक : डॉ. आंबेडकरांनी बुद्ध आणि कबीरानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानले होते. त्याचे मुख्य कारण बुद्ध आणि कबीराप्रमाणे येणाऱ्या धर्मव्यवस्थेला फुले यांनी आव्हान दिले होते. बुद्धाने सांगितले होते की, सत्याची, धर्माची चिकित्सा करा. धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. तसेच ज्या गोष्टी अनुभवास येत नाहीत, ज्यांची पडताळणी करता येत नाही किवा ज्यांच्या अस्तित्वाचा पुरावा नाही त्यांना सत्य मानू नका. असे विचार प्रसिद्ध लेखक व विचारवंत, माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या महात्मा फुले व डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती समारंभानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, यज्ञ, वेद, आत्मा, परमात्मा,पुनर्जन्म या साऱ्या धार्मिक संकल्पनांविरुद्ध फुले, आंबेडकरानी बंड उभे केले. फुले महान बंडखोर आहेत. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरू मानले होते. हजारो वर्षांच्या इतिहासात स्त्री, शुद्र, शेतकरी यांच्यासाठी कुणीही आंदोलने केली नाहीत. तसेच धार्मिक, सांस्कृतिक सत्तेला प्रश्न विचारले नाहीत. हे काम फुले यांनी केले. म्हणूनच त्यांना जनतेने महात्मा ही पदवी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य सचिव प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन कार्याध्यक्ष संजय करंजकर व प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. परिचय वसंत खैरनार यांनी करून दिला. ॲड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले.
इन्फो
देशाच्या नवनिर्माणातील योगदान
भारतात अस्पृश्यांसाठी आणि मुलींसाठी महात्मा फुले यांनी प्रथम शाळा काढण्याचे धाडसाचे काम केले. डॉ. आंबेडकरांनी आपले शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक धोरण फुलेंच्या कार्य आणि कर्तृत्वाकडे पाहूनच ठरवले. त्यांनी सामाजिक क्रांतीला, राजकीय स्वातंत्र्याला अधिक महत्व दिले. दोघांची कामे परस्परांना पूरक राहिली. एवढेच नव्हे तर घटनेत स्त्रियांचे, दलितांचे हक्क अबाधित कसे राहतील हे डॉ. आंबेडकर यांनी पाहिले. वाघ यांनी फुले, आंबेडकर यांच्या देशाच्या नवनिर्माण कामातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष वेधले.
फोटो