नाशिक : आॅगस्टमध्ये जिल्ह्णात सर्वदूर हजेरी लावणाऱ्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून, महिनाअखेर जिल्ह्णातील सर्व टॅँकर बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यातही टॅँकरची मदत घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातूनही यंदा टॅँकर हद्दपार झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत अजूनही २० टक्के पाऊस कमी झालेला असला तरी, आॅगस्ट २०१३ अखेर जवळपास ८० टॅँकरद्वारे ७३ गावे, २७५ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. यंदा जून व जुलै या दोन महिन्यांत पाठ फिरविणाऱ्या पावसाने आॅगस्टमध्ये जोरदार हजेरी लावली. परिणामी नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागतानाच धरणांच्या पाणी साठ्यातही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्णात आजमितीला धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के इतका साठा असून, त्यातही गंगापूर धरण समूहात ८० टक्के, पालखेड समूहात शंभर टक्के, तसेच गिरणा समूहात ४२ टक्के साठा आहे. अजूनही पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काही भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गावाकडील पाझरतलाव, शेततळ्यांमध्येही पाणी साठल्याने गावाच्या विहिरींनाही पाणी उतरले आहे. अशा परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. ३१ आॅगस्टअखेर जिल्ह्णातील सिन्नर, नांदगाव, चांदवड या तीन तालुक्यांतील दोनशे गावांना ३१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. मात्र सोमवारी ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होता, तेथे पाण्याचा स्त्रोत निर्माण झाल्याने प्रशासनाने टॅँकर बंद करण्याचा निर्णय घेतला असून, यंदा पहिल्यांदाच संपूर्ण जिल्हा टॅँकरमुक्त झाला आहे.
जिल्हा टॅँकरमुक्त; पाण्याचा प्रश्न सुटला
By admin | Updated: September 3, 2014 00:37 IST