पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पाणीप्रश्नासह विविध विषयांंवर चर्चा करण्यात आली.ग्रामसभेस विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम पगार, उपाध्यक्ष संजीव वारुळे, उपसरपंच योगीता वाळुंज, सुभाष पगार, सोमनाथ पगार, विलास निरगुडे, आत्माराम पगार, विश्वनाथ पगार, बाबासाहेब पगार, बाजीराव कांडेकर, प्रकाश पांगारकर, संतोष पगार, भास्कर निकम, रावसाहेब पेखळे, रभाजी पगार, गणेश पगार, तुषार निरगुडे आदि उपस्थित होते. पाणीपुरवठा योजनेच्या कर्मचाऱ्यांकडे ग्रामसेवकांनी लक्ष देऊन नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महिन्यातून केवळ २-३ वेळा पाणी येत असल्याने पाणीपट्टी माफ करावी किंवा जितके पाणी दिले जाते तितकेच बिल आकारण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. पेयजल योजनेचे पाणी मिळत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. स्वामी समर्थ मंदिर बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी प्रकाश पांगारकर यांनी केली. त्यासाठी लेखी अर्ज करण्यात आला. गावात करण्यात येत असलेल्या अंतर्गत रस्त्यांची माहिती मिळत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य विलास निरगुडे यांनी केली. रस्ता कामाच्या दर्जाबाबत माहिती देण्याची मागणी निरगुडे यांनी केली.अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार करत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी महेश निरगुडे यांनी केली. विकास संस्थेच्या कर्ज वाटपावर चर्चा होऊन थकलेल्या कर्जांचे पुनर्गठण करता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अनुदान वाटपप्रसंगी एनडीसीसी बॅँकेचे काही कर्मचारी चिरीमिरीची अपेक्षा ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. याबाबत ठराव करून बॅँकेस पाठविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. पांगरीत लवकरच फिल्टर प्लॉण्ट बसविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच पांगारकर यांनी दिली. (वार्ताहर)
पांगरी येथे ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
By admin | Updated: May 4, 2016 00:02 IST