दिंडोरी : धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी शहराचा दोन महिन्यात तिसऱ्यांदा पाणीपुरवठा ठप्प झाला असून, धरण उशाशी, पाण्यावाचून उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासन पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत दाखवत असलेल्या अनास्थेबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.दिंडोरी शहराला वाघाड धरणातून पाणी कोळवण नदीवरील साठवण बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. पंधरवड्यापूर्वी दहा-बारा दिवस पाणीपुरवठा ठप्प होता. त्यावेळी आवर्तन सोडले गेले; मात्र त्यात निम्माच बंधारा भरल्याने दहा-पंधरा दिवसातच पाणीसाठा संपला. दिंडोरीवासीयांना त्यानंतर चार दिवसाआड अवघे तीनवेळा पाणी मिळाले असून, आठ दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान, आवर्तनाची मागणी करण्यात येऊन त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सध्या धरणातील पाणीसाठा कमी असल्याने पाणी सोडण्याबाबत सर्वस्वी अधिकार जिल्हाधिकारी यांना असून, त्यांची परवानगी न मिळाल्याने वाघाड धरणातून पाणी सोडले न गेल्याने दिंडोरीत पुन्हा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराच्या बहुतांशी भागात आठ दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने हाल होत आहे. (वार्ताहर)
दिंडोरी शहराचा पाणीपुरवठा ठप्प
By admin | Updated: December 12, 2015 22:37 IST