नाशिक : शहरातील बसफेऱ्या वाढविणे व मासिक बस पास केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी छात्रभारती संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागाकडून ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थांचे प्रमाणही वाढले आहे. विद्यार्थ्यांचा शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला प्रतिसाद मिळत असताना, त्यांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नाशिक शहर, तसेच ग्रामीण बस वाहतूक अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्याचप्रमाणे, अद्याप मासिक, तसेच त्रैमासिक विद्यार्थी बसपासही सुरू झालेले नाहीत, त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे नमूद करीत शहरातील बसच्या फेऱ्या वाढविण्यासोबतच बस पास सुविधाही पूर्ववत सुरू करण्याची मागणी छात्रभारतीने या निवेदनातून केली आहे. यावेळी शहाराध्यक्ष सदाशिव गणगे यांच्यासह गायत्री काळे, देविदास हजारे, आशिष कळमकर व श्रद्धा कापडणे उपस्थित होते.
(आरफोटो- छात्रभारती) एसटीचे विभाग नियंत्रत नितीन मैद यांना निवेदन देताना छात्रभारतीचे गायत्री काळे, सदाशीव गणगे, देविदास हजारे, आशिष कळमकर व श्रद्धा कापडणे.