जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक कोरोनाची साथ असल्यामुळे ऑनलाईन पार पडली. पालकमंत्री छगन भुजबळयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. कृषीमंत्री दादा भुसे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बोरसे, दिलीप बनकर ,जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी सहसंचालक संजीव पडवळ , कृषी अधीक्षक विवेक सोनवणे तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी व शेतीशी संबंधित इतर विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सभेस उपस्थित होते.
आमदार बोरसे यांनी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मांडले. त्यामध्ये प्रामुख्याने अर्ली द्राक्ष पिकास विमा कवच देण्यात यावे, हवामान आधारित डाळिंब फळ पीक विमा योजनेतील जटिल अटी शिथल करण्यात याव्यात, बागलाण तालुक्यासाठी कांदा चाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण या शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय व गरजेच्या योजना आहेत यासाठी वाढीव लक्षांक देण्यात यावा, कृषी विभागाच्या योजना महाडीबीटी पोर्टलमार्फत राबविण्यात येत आहेत. या पोर्टलमध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जावे लागते तेथे कालापव्यय होतो व पैसेदेखील खर्च होतात यामध्ये सुटसुटीतपणा आणावा, तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्याबाबत बँकांना सूचना देण्यात याव्यात, आदिवासीबांधवांना वनपट्टे देण्यात आलेले आहेत परंतु वनपट्ट्यातील जमिनीचे क्षेत्र हे वाहितीखालील क्षेत्रांमध्ये गणले जात नाही त्यामुळे आदिवासी भागांमध्ये खतांची मागणी करताना वनपट्टाधारक जमिनीचा देखील विचार करून मागणी करावी जेणेकरून हंगामामध्ये तुटवडा भासणार नाही, तसेच बागलाण तालुका हा अर्ली द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे. अर्ली द्राक्षामुळे देशास परकीय चलन मिळते परंतु पूर्वहंगामी द्राक्ष घेत असताना साधारणपणे जुलै ते डिसेंबर या कालावधीत कोरोनामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते, त्या अडचणी दूर करण्यात याव्यात, अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या बोरसे यांनी केल्या.
पालकमंत्री भुजबळ व कृषीमंत्री भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.