नाशिक : मागील तीन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. यावर्षी विभागात सर्वाधिक १०९ कॉपीबहाद्दर नाशिक जिल्ह्यात आढळून आले आहे.दहावीच्या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाकडून बैठे पथकांसह भरारी पथकांची नियुक्ती केली जाते. तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशनही करण्यात येते; मात्र नाशिक जिल्ह्यात बारावीप्रमाणे दहावीचे कॉपीबहाद्दर परीक्षार्थी सर्वाधिक आढळून आले आहे. निकालाच्या दृष्टीने जरी नाशिक तिसऱ्या क्रमांकावर असला तरी कॉॅपीप्रकरणांच्या बाबतीत नाशिक अव्वल स्थानावर आहे. यावर्षी १०९ कॉपीबहाद्दर भरारी पथकाला नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर आढळून आले आहेत. २०१३ साली शहरात २७, तर २०१४ मध्ये केवळ सहा आणि २०१५ साली ६२ विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करताना आढळून आले होते. यावर्षी थेट कॉपीबहाद्दरांनी शंभरी गाठली आहे. नाशिक जिल्ह्यातील १८४ केंद्रांसाठी सहा भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती. धुळे - २१, जळगाव - ५३, नंदुरबार - १४ कॉपीबहाद्दर आढळून आले आहे.
नाशकात गाठली कॉपीबहाद्दरांनी शंभरी
By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST