यावर्षी नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाचे नियोजन कोलमडले होते. जून महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावणाऱ्या पावसाने नंतर दडी मारली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाचा जोर कमी आहे.
अडीच महिन्याच्या कालावधीत मोठा पाऊस झालेला नाही त्यामुळे खरिपातील पिकांची वाढ झालेली नाही. नांदूरशिंगोटे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतले आहे. गेल्या महिन्यापासून गायब झालेला पाऊस बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरु झाला आहे.
गुरुवारी (दि.१९) सकाळपासून संततधार पावसाने नागरिकांना सूर्य दर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला तसेच शेतातील कामेही ठप्प होती. संततधार पावसाने खरिपातील पिकांना दिलासा मिळणार आहे.
पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होऊन धरणातील पाणी साठ्यात वाढ होते, तसेच नद्या-नाल्यांना पूर येतात. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने आतापर्यंत सरासरीच्या ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे. या संततधार पावसाने सर्वत्र दलदल निर्माण झाली होती.