उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील विजय-ममता सिग्नल चौफुलीवर कंटेनर व ट्रकच्या झालेल्या अपघातामुळे कंटेनर वाहतूक बेटावर जाऊन धडकल्याने त्यामधील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या स्मृतीस्तंभाचे काही प्रमाणात व वाहतूक बेटाचे मोठे नुकसान झाले आहे. विजय-ममता सिग्नलवर चौफुलीवर मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास द्वारकाकडून सिन्नरच्या दिशेने कंटेनर (एमएच ४६, एएफ ३८६४) जात होता. यावेळी अचानक अशोका मार्गाकडून तपोवनकडे शेणखत घेऊन ट्रक (एमएच २० ए, १७८६) रस्त्यात आडवा आल्याने कंटेनरचालकाने अपघात टाळण्यासाठी तपोवनरोडच्या दिशेने कंटेनर वळविला. मात्र त्यात पूर्ण यश न आल्याने कंटेनर व ट्रकची धडक झाली. यामध्ये कंटेनर बाजूला असलेल्या वाहतूक बेटावर जाऊन आदळल्याने त्या ठिकाणी असलेल्या श्री समर्थ रामदास स्वामी स्मृतीस्तंभाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वाहतूक बेटाची लोखंडी रॅलिंग व इतर बांधकाम तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही अपघातग्रस्त वाहने दुपारपर्यंत आहे त्या स्थितीतच होती. (वार्ताहर)मागील महिन्यात दोन अपघातनाशिक-पुणारोडवरील विजय-ममता चौकात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नाशिक-पुणे महामार्गावरून टाकळी आणि अशोकामार्ग यांना जोडणारा चौक आहे. मात्र चौकातून वळण घेताना वाहने भरधाव वेगात इतर वाहने तसेच दुभाजकावर आदळत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. मागील महिन्यात याच दुभाजकावर दोन कार अपघातग्रस्त झाले आहेत. विशेषत: रात्रीच्या सुमारास चौक ओलांडताना तसेच मुख्य रस्त्यावरून टाकळीकडे वळण घेताना अपघाताचे सर्वाधिक प्रकार घडले आहेत.
वाहतूक बेटात कंटेनर घुसला
By admin | Updated: March 28, 2017 23:08 IST