शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी
नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या बाजारात अनेक शेतकरी मास्कचा वापर करीत नाहीत. त्याचबरोबर फिजिकल डिस्टसिंगकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीमुळे नाराजी
नाशिक : शहरातील अनेक भागांत उघड्यावर मांसविक्री होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध भागांतील मुख्य रस्त्यांवरच मांसविक्रीची दुकाने असून सकाळपासून सायंकाळपर्यंत या ठिकाणी मांसविक्री सुरू असते. यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
किराणा मालाच्या दरवाढीमुळे नाराजी
नाशिक : किराणा मालातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात पगार कमी झालेले असतानाच महागाईचा भडका उडाल्याने आर्थिक ताळमेळ बसविताना अनेकांची घालमेल होत आहे.
वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी
नाशिक : शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच झाली असून वारंवार तक्रार करुनही वाहतूक शाखा याकडे लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर उभी करण्यात येणारी बेशिस्त वाहनचालक आदी विविध कारणांमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
शहरात रंगतेय निवडणुकीची चर्चा
नाशिक : शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी आदी विविध भागांत आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. चौकाचौकात तरुण, ज्येष्ठ नागरिक याबाबत चर्चा करून आपापल्या पध्दतीने अंदाज व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
सरपंचपदाने हुलकावणी दिल्याने नाराजी
नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीत आपल्या सोयीचे आरक्षण न निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकांनी सरपंचपदाची स्वप्न पाहिले मात्र आरक्षण सोडतीत सरपंचपद दुसऱ्याच प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे अनेक गावांत वादही निर्माण झाले होते.