नाशिक : मंगळवारी शहराचे कमाल तपमान थेट ४१ अंशावर जाऊन पोहचले होते. गुरुवारी (दि.२१) दिलासा मिळाला. शहराचे तपमान तीन अंशांवरून खाली आले. हवामान खात्याने ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद केली.‘कुल सिटी’ अचानक ‘हॉट’ झाल्याने नाशिककर हैराण झाले होते. कारण गेल्या वर्षी मे महिन्यात शहराच्या तपमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहचला होता; मात्र यंदा एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात तपमान थेट ४१वर गेल्याने नाशिककरांना कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. रात्रीही उष्मा जाणवत असल्याने घरात बसणेही कठीण झाले होते. शीतपेय, वातानुकूलित यंत्र, पंखे आदिंचा वापर सध्या वाढला आहे. शीतपेयांच्या दर्जाबाबत वैद्यकीय विभागाकडून शंका घेतली जात आहे. कारण बहुसंख्य शीतपेय प्राशन केल्यानंतर घसा व सर्दीसारखे आजार जडत असल्याने दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या दिसून येत आहे. शहरात विविध कारखान्यांमध्ये तयार होणारा बर्फ, लिंबू सरबत, रसवंतीगृह, ज्यूस सेंटरमध्ये वापरला जाणारा बर्फ व तत्सम पदार्थांची अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी होणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
शहराचे तपमान ३८.५
By admin | Updated: April 22, 2016 01:56 IST