नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने पुन्हा समाजकंटकांचा धसका घेत शहरातील बिघडलेल्या कायदासुव्यवस्थेमुळे शहर बससेवेला ‘ब्रेक’ लावणे पसंत केले. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपासून बंद झालेली बससेवा बुधवारी (दि.१२) रात्री उशिरापर्यंत बंद राहिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.परिवहन महामंडळाची शहर, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील बससेवा रविवारपासून विस्कळीत झाली आहे. परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने मुंबई मार्गावरील सर्व बसेस मागील चार दिवसांपासून पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. या मार्गावरील कुठल्याही शहरापर्यंत एकही बस अद्याप नाशिकच्या महामार्ग स्थानकातून सोडण्यात आलेली नाही. तसेच मुंबईहून एकही बस शहरात आलेली नाही. सोमवारी सकाळी शहर बस वाहतूक रात्रीपर्यंत सुरळीत सुरू राहिल्याने नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबरोबरच मंगळवारी शहरासह ग्रामीण बससेवाही पूर्ववत झाली; मात्र मंगळवारी सायंकाळपासूनच पुन्हा विविध भागांमध्ये समाजकंटकांकडून कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्या घटना घडू लागल्याने पोलीस प्रशासनाने महामंडळाला बससेवा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्काळ महामंडळाने शहरातील शंभराहून अधिक बसेस तत्काळ आगारामध्ये थांबविल्या. (प्रतिनिधी)
शहर-ग्रामीण बससेवेला पुन्हा ‘ब्रेक’
By admin | Updated: October 13, 2016 01:29 IST