ओझर : वर्ष सरत असताना ग्रामीण भागात मात्र नोटाबंदीच्या झळा कायम असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सरत्या वर्षात चलनटंचाईमुळे आर्थिक पातळीवर प्रत्येक मध्यमवर्गीयाची बरीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.नोटाबंदीने पन्नास दिवसांचा टप्पा गाठला, परंतु सामान्य माणसाला अजूनदेखील अनेक मूलभूत गरजांना कात्री लागलेली प्रकर्षाने जाणवतेय. कारण खात्यावर पैसे असूनही काढण्यावर निर्बंध, चलन तुटवडा यामुळे दैनंदिन खर्च करतानादेखील अनेकांचा खिसा रिकामा आहे. याचा थेट परिणाम बाजारावर झालेला दिसतोय. लहानमोठे व्यापारीदेखील कधी नव्हे इतक्या मंदीच्या मानसिकतेमध्ये आहेत. बँकांमध्ये रांगा कायम आहेत. एटीएमच्या बाहेरदेखील गर्दी कायम असून, अर्ध्याहून अधिक वेळ त्यात पैसे शिल्लक राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे आपण ज्या शेतकऱ्याच्या जिवावर जगतो त्याच्याच शेतमालाला भाव नाही.एकूण एकरी लावलेल्या खर्चाइतकेदेखील उत्पन्न आज मिळत नसल्याचे भीषण चित्र आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे शेवटचे दोन महिने पूर्णपणे आर्थिक नियोजनात गेले असल्याने त्याचा अजून किती महिने परिणाम असेल हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही.नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकांचा बार उडणार आहे. फक्त याच क्षेत्रात गरम वातावरण असून, त्याची रंगीत तालीम काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. (वार्ताहर)
ग्रामीण भागात नोटाबंदीमुळे नागरिक त्रस्त
By admin | Updated: January 1, 2017 22:57 IST