नाशिक : समाजकल्याण विभागातील जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाकडे प्रकरणे दाखल होण्याचा वेग कायम असून, अनेक प्रकरणी निकालीदेखील काढण्यात आली असल्याचा दावा पडताळणी विभागाकडून करण्यात आला आहे. नोकरीविषयक प्रकरणांच्या त्रुटींची मुदत गेल्या ३० जुलै रोजी संपल्यानंतर सदर प्रकरणांचा निपटारा केला जात असून, आतापर्यंत सुमारे दोन हजार पडताळणी दाखले देण्यात आले आहेत. नाशिक येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाकडे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रकरणे दाखल होत असतात. गेल्या वर्षभरात या कार्यालयाकडे सुमारे १२ हजार २५९ प्रकरणे दाखल झाली होती. या प्रकरणांच्या पडताळणीचे कामकाज सुरू झाले आहे. यातील सुमारे दोन हजार प्रकरणांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच यातील ३८ प्रकरणांमध्ये उमेदवारांनी न्यायालायात धाव घेऊन पडताळणी विभागाच्या निर्र्णयाला आव्हान दिले आहे, तर दक्षता पथकाकडे सुमारे ५२३ इतकी प्रकरणे आहेत. सध्या १०,३४५ प्रकरणे अद्यापही शिल्लक आहेत. जात पडताळणीचे प्रमाणपत्र देताना अनेक पातळीवर काम करावे लागत असल्याने प्रकरणांच्या चौकशीत अनेक प्रकरणे अडकली आहेत. संबंधित उमेदवारांकडून अपेक्षित कागदपत्रे दाखल होत नसल्याने तसेच कागदपत्रांमध्ये खोडाखोड केली जात असल्याचीदेखील अनेक प्रकरणे समोर आल्याने अशा प्रकरणांवर निर्णय घेणे अवघड होऊन बसते. त्यामुळे प्रकरणांचा निपटारा करणे कठिण होऊन बसत असल्याचेही सांगण्यात आले. सध्या नोकरी आणि शैक्षणिक प्रकरणे निकाली काढली जात असून, यातील असंख्य प्रकरणे निकाली देखील काढण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)