नाशिक : शहराच्या कमाल तपमानात मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसत आहे. वाढत्या तपमानामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. शहरातील रस्ते सकाळी अकरा वाजेपासूनच ओस पडण्यास सुरूवात झाली होती. मंगळवारी (दि.२८) दुपारी शहरातील बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. मंगळवारीदेखील तपमानाचा पारा ४०.३ अंशावरच स्थिरावला. आठवडाभरापासून शहराच्या तपमानाचा पारा वाढता वाढता चाळीशीच्या पुढे गेल्यामुळे नाशिककरांना ऊन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडल्याने ४०.३ इतका उच्चांक पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात नोंदविला गेला. हवामान खात्याने सोमवारी (दि.२७) दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीती व्यक्त करण्यात आली. अंदाजानुसार मंगळवारी नाशिकरांना प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास आल्या. सोमवारपेक्षाही उन्हाची तीव्रता वाढली असल्याची चर्चा दिवसभर नागरिकांमध्ये सुरू होती. उष्माघातापासून संरक्षणासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात होता. नाशिककरांनी मार्च महिन्यात एक दशकानंतर प्रथमच नाशिककरांनी मार्च महिन्यातच ४० अंश इतके कमाल तपमान अनुभवले. कमाल तपमानाचा पारा थेट ४०.३ अंशापर्यंत सरकरल्याने नाशिककर उष्म्याने हैराण झाले आहे.
उष्णतेच्या लाटेने नाशिककरांच्या जीवाची लाही लाही
By admin | Updated: March 28, 2017 17:47 IST