नाशिक : ‘उठ नाशिककर जागा हो, स्मार्ट सिटीचा धागा हो’, असे आवाहन करत नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून भाजपाने स्मार्ट सिटीच्या समर्थनार्थ आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, भाजपाच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका महासभेने ठरावात दुरुस्ती न केल्यास राज्य शासनाने सदर घटनाबाह्य ठराव विखंडित करावा, यासाठी येत्या सोमवारी (दि.१४) सभागृहात मागणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटी योजनेबद्दल विरोधाची भूमिका जाहीर केल्यानंतर महासभेने एसपीव्ही वगळून केलेला ठराव महापौर अशोक मुर्तडक यांनी शुक्रवारी (दि.११) नगरसचिव विभागाला पाठवून दिला. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानात नाशिकच्या सहभागाची शक्यता जवळपास मावळली आहे. मनसेने घेतलेली भूमिका आणि महासभेच्या ठरावाविरुद्ध भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याची सुरुवात सायंकाळी मेनरोडवर नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेने करण्यात आली. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी घोषणाबाजी करत स्मार्ट सिटीत सहभागाची मागणी केली. तत्पूर्वी, भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. देवयानी फरांदे यांनी सांगितले, महापालिकेची महासभा ही सार्वभौम आहे आणि तिचे अधिकार राज्य अथवा केंद्र सरकार हिरावून घेऊ शकत नाही. मात्र, एसपीव्हीबाबत चुकीची मते मांडून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. महासभेत सदस्यांनी केवळ करवाढीला विरोध दर्शवित स्मार्ट सिटीचे समर्थन केले आहे. परंतु पीठासन अधिकारी असलेल्या महापौरांनी बहुमताचा कौल लक्षात न घेता नियम धाब्यावर बसवून निर्णय दिलेला आहे. महापालिकेत सध्या घटनाबाह्य कामकाज सुरू आहे.
‘स्मार्ट सिटी’साठी भाजपा आक्रमकस्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2015 23:28 IST