लासलगाव : भ्रष्टाचाराचे आरोप असलेले एकनाथ खडसे यांना हटवून आपण घोटाळेबाज मंत्री मंत्रिमंडळात ठेवत नाही, असा खोटा देखावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे, चिक्की घोटाळा करणाऱ्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व ब्लॅँकेट घोटाळ्यातील आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांची हकालपट्टी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.सोमवारी सकाळी लासलगाव येथील काँग्रेस नेते अशोकराव होळकर व गुणवंतराव होळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते यांच्याशी पक्ष बांधणीबाबत चर्चा केली. नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर, बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, जगदीश होळकर, डॉ. विकास चांदर, विजय सदाफळ, मदनलाल बाफना, ओमप्रकाश राका, मोहनलाल दायमा, डॉ. विकास चांदर, महेश बाफना, भरत वडनेरे, अरविंद देसाई, बाळासाहेब बोरसे, संतोष ब्रह्मेचा यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सुमारे एक तास कांदा प्रश्न, कांदा निर्यात, बाजार समितीचे नियमातील बदल, लोकसहभागातून करावयाची विकासकामे याबाबत माहिती घेतली. (वार्ताहर)
‘त्या’ मंत्र्यांची हकालपट्टी करण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2016 07:32 IST