दत्ता दिघोळे ल्ल जायगावसिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील सर्वच रस्त्यांची मोेठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी व व्यापारी यांची कुचंबणा होत आहे. दळणवळणाची गैरसोय होत असतानाही शासकीय अधिकारी या परिस्थितीकडे काणाडोळा करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.नायगाव खोऱ्यातील ब्राह्मणवाडे, वडझिरे, जायगाव, देशवंडी, सोनगिरी, जोगलटेंभी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत, काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून, साईडपट्ट्या नसल्याने दोन वाहनेही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. साईडपट्ट्या खोलवर गेल्याने अपघतांची भीती वाढली आहे. दूध, भाजीपाला तसेच विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्यापुढे प्रवासासाठी या रस्त्यांचे आव्हान उभे राहिले आहे. पावसामुळे या रस्त्यांची वाताहत झाल्याने परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र शासकीय अधिकारी रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या भागातून सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर ते सायखेडा हा महत्त्वाचा रस्ता आहे. औद्योगिक कामगार, शेतकरी, व्यापारी यांच्यासह प्रवाशांची या रस्त्याने मोठी वर्दळ असते. तसेच बारागावपिंप्री ते शिंदेमार्गे नाशिक हा रस्ताही महत्त्वाचा आहे. परिसरातील सर्वांत चांगला रस्ता म्हणून ओळखला जाणारा रस्ता गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अवजड वाहनांची गर्दी वाढल्याने मोठ्या प्रमाणात खचला असून, खड्डे पडले आहे. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वडांगळीपासून नाशिक येथे शेतमाल विक्रीसाठी याच रस्त्याने जात आहे. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना हेलपाटा घेऊन लांबपल्ल्याच्या मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होतो. परिसरातील गोदावरी नदी काठच्या शिवारात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातूनही कांदा या नगदी पिकासह विविध भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड या परिसरात केली जाते. हा माल विक्रीसाठी नाशिक येथील बाजार समितीमध्ये पाठविला जातो. मात्र सध्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याने अनेक वाहनचालक या रस्त्याने माल घेऊन जाण्यास नकार देत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. या रस्त्यांवर जिल्हा परिषदेचे मैल कामगार यापूर्वी रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करीत होते. मात्र अनेक दिवसांपासून हे कामगार रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे खड्ड्यांच्या संख्येत भर पडत असून, साईडपट्ट्या खोलवर गेल्याने तसेच निसरड्या झाल्याने अपघाताना निमंत्रण देणाऱ्या ठरू लागल्या आहेत. (वार्ताहर)
नायगाव खोऱ्यातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था
By admin | Updated: August 13, 2014 00:41 IST