नाशिक : पावसाने दिलेली ओढ व त्यात विजेची वाढलेली मागणी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. धरणातील पाणी थांबविल्यामुळे कोयना, दाभोळ तर कोळशाच्या तुटवड्यामुळे पारस, भुसावळ व परळीचे संच बंद पडण्याची वेळ आल्याने सेंट्रल ग्रीड किंवा खासगी वीजनिर्मिती कंेद्रांकडून वीज खरेदी करण्याचा पर्याय त्यांनी बोलून दाखविला आहे. नाशिक येथे विविध कार्यक्रमांनिमित्त आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी बोलताना विजेची सध्याची स्थिती कथन केली. कोयना धरणातील पाणी कमी झाल्याने वीज निर्मितीसाठी पाणी थांबविण्यात आल्याने कोयनेतील वीज उत्पादन बंद करण्यात आले, तर दाभोळ प्रकल्पही बंद पडला आहे. परळी केंद्रासाठी पुरेसा कोळसा नसल्याने त्याचे दोन संच बंद पडले आहेत. पारस, भुसावळ केंद्रांची अवस्थाही तशीच असून, एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी १४ दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात विजेचे संकट उभे राहील. त्यासाठी पुरेसा कोळसा राज्याला मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. इतर राज्यांना ज्या प्रमाणात कोळसा मिळतो, त्या प्रमाणात महाराष्ट्राला मिळावा म्हणून केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्याशीही संपर्क करण्यात आला आहे. राज्य सरकार सर्वतोपरि प्रयत्न करीत असून, प्रसंगी सेंट्रल ग्रीडमधून वीज घेण्यात येईल किंवा खासगी कंपन्यांकडूनही वीज खरेदी करण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. आगामी रमजान महिना, पंढरपूरची वारी लक्षात घेता, वीज व पाण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. मध्यंतरी वादळामुळे अनेक टॉवर्स, विजेचे खांब उद्ध्वस्त झाल्याने वीजपुरवठ्यात अडचणी आल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
वीज प्रश्नावर अजित पवार चिंतेत
By admin | Updated: July 1, 2014 00:42 IST