राजीव वडगे ल्ल मालेगावइंग्रजांची १५० वर्षांची जुलमी राजवट उलथवून भारत देश स्वातंत्र्य झाला. १४ आॅगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकविला. हा ऐतिहासिक क्षण सुवर्णअक्षरांनी कोरला. तेव्हापासून संपूर्ण भारत देशात १५ आॅगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देशात सकाळी ध्वजारोहण आदि कार्यक्रमाने स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. मात्र याला अपवाद ठरले ते मालेगावचे राष्ट्र सेवा दल.‘सदैव सैनिका पुढेच यायचे’ हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असणारे सेवा दल सैनिक मात्र १४ आॅगस्टच्या मध्यरात्री तिरंगा फडकावून स्वातंत्र्य दिनाचे स्वागत करतात. ही परंपरा गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून येथे सुरू आहे, हे विशेष. स्वातंत्र्यसैनिक ओंकारआप्पा लिंगायत, दत्ता वडगे, डॉ. सुगन बरंठ, हरिष पाठक, सुनील राणे, किशोर जाधव, भास्कर तिवारी, संजय जोशी, सुधीर साळुंके, गोकुळ वाणी, उषा मंजिरे, नचिकेत कोळपकर, डॉ. बहार देवरे आदिंचे प्रयत्नातून हा उपक्रम सुरू झाला आहे. माजी गृहमंत्री भाई वैद्य, सेवा दलाचे महामंत्री कै. बा.य. परीट गुरुजी, प्रा. अरविंद कपोले, विद्यमान महामंत्री माधव गुरव, अॅड. दिलावर खान, यदुनाथ थत्ते, माजी शिक्षक आमदार जे.यू. ठाकरे, शाहीर लीलाधर हेगडे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, अर्जुन कोकाटे, बृहस्पती शर्मा (मध्य प्रदेश) आदि मान्यवरांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे. सेवा दलाच्या घोषणा देत मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांनी मान्यवर अतिथींच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकविला जातो. राष्ट्रगीताने स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. तोही १९८३ पासून दरवर्षी अखंडपणे. याहीवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. यावर्षीचे मान्यवर अतिथींच्या हस्ते साने गुरुजी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार ही प्रथमच प्रदानही करण्यात येणार आहे.
मालेगावी राष्ट्र सेवा दलाची ३० वर्षांची परंपरा
By admin | Updated: August 13, 2014 00:41 IST