प्रकाशा येथील बॅरेजमध्ये गेल्या १० ते १२ वर्षांपासून १०० टक्के पाणीसाठा होत आहे. आजही बॅरेज तुडुंब भरला आहे. या बॅरेजवर ११ उपसा सिंचन योजना आहेत. मात्र सद्य:स्थितीत एकही योजना सुरू नाही.
बॅरेजमधून ७७१ शेतकऱ्यांनी दीर्घकालीन तर ७०शेतकऱ्यांनी हंगामी परवानगी घेतली आहे. दोन्ही मिळून आजच्या स्थितीला फक्त ५५० ते ६०० हेक्टर शेतजमिनीला त्याचा फायदा होत आहे. ११ उपसा सिंचन योजना सुरू झाल्या असत्या तर आठ हजारांपेक्षा जास्त हेक्टर शेतीला पाणी मिळाले असते व परिसर सुजलाम सुफलाम झाला असता. प्रकाशा बॅरेज अंतर्गत प्रकाशा, नांदरखेडा, पळासवाडा, शेल्टी, सजदे, बिलाडी, बामखेडा, अडावद, कौठळ, सारंगखेडा, सुजालपूर, बोराळा, कोपर्ली, हाटमोहिदा, ओसर्ली, बोराळे, विखरण, खोंडामळी, शिंदे, सिंदगव्हाण, जुनमोहिदे, मांजरे, भालेर या गावातील शेतकऱ्यांनी दीर्घकालीन व हंगामी परवानगी घेतली आहे. या बॅरेजवर असलेल्या ११ उपसा योजनांची कामे अपूर्ण तर काहींची कामेही सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना बॅरेजच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
प्रकाशा बॅरेजवरून समशेरपूर साखर कारखाना पाणी उचलत आहे. तसेच कोपर्ली गावाची पाणीपुरवठा योजना याच बॅरेजवर आहे. भालेर एमआयडीसीने परवानगी घेतली आहे, मात्र अद्याप त्यांनी पाणी उचलणे सुरू केलेले नाही.
बॅरेज प्रशासनाची उदासीनता
प्रकाशा बॅरेजवर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना मार्गावर काटेरी झुडपे उगवले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. सुरक्षा रक्षक आहेत मात्र त्यांना आवश्यक सुविधा नाहीत. बॅरेजवरील ९०पैकी फक्त ११ पथदिवे सुरू आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जेचे पथदिवे बसवलेत, मात्र तेदेखील बंद आहेत. सिद्धेश्वर मंदिराकडून येताना रस्त्यावर खड्डे आहेत. परिसरात झाडेझुडपे वाढलेली असून चोरांना सहज चोरी करता येईल, अशी स्थिती आहे. बॅरेजला अधिकारीही भेटी देत नाहीत.