लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जगात आजवर जे जे मोठे आजार व रोग आहे त्यावर लसीकरणातून नियंत्रण मिळवता आले आहे, हे आजवरचे उदाहरण आहे. कोरोनाबाबतही आपल्या शास्त्रज्ञांनी अतिशय कमी वेळात लस तयार केली आहे. त्यासंदर्भात अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी. लसीकरणामुळे स्वार्थाबरोबर परमार्थही साधता येतो. आपण तर स्वस्थ व्हाल व त्यातून समाजालाही सुरक्षित ठेवण्यात आपला वाटा राहणार आहे, असे राष्ट्रीय लसीकरण जागृती समितीचे सदस्य व बालरोगतज्ज्ञ डॉ.जयंत शाह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रश्न : कोरोनावरील लस १०० टक्के सुरक्षित आहे का?
जगात १०० टक्के सुरक्षित असे काहीच नाही. प्रत्येक गोष्टीचा थोड्याफार फरकाने काही ना काही परिणाम आहेच. कोरोनावरील सध्या ज्या लसी तयार झाल्या आहेत त्या आपल्या शास्त्रज्ञांनी खूप मेहनतीने व कमी वेळेत तयार केल्या आहेत. जंतूवर प्रक्रिया करून लस तयार केली जाते. ही लस जेव्हा शरीरात दिली जाते तेव्हा ती शरीरातील पेशींना जेव्हा संबंधित रोगाचे जंतू शरीरात आल्यास त्याला कसे प्रतिकार करायचे याबाबत काम करीत असतात. त्यामुळे लस दिल्यानंतर शरीरात काही ना काही बदल झाल्यामुळे प्राथमिक काही प्रतिक्रिया एखाद्या वेळेस दिसतात. त्यात किरकोळ ताप येणे, अंगदुखी असे प्रकार पण हे साध्या औषधीनेदेखील तात्काळ घालविता येतात. मात्र हीच लस आपल्याला गंभीर आजार व मृत्यूपासून वाचविते. केवळ आपणच त्यातून सुरक्षित होत नाही, तर आपल्यापासून इतरांनाही सुरक्षित ठेवता येते. त्यामुळे ज्या अफवा आहे, जे गैरसमज आहे ते ते दूर केले पाहिजे व सर्वांनी लसीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोनाला पूर्णपणे रोखायचे असेल तर लस हेच महत्त्वाचे हत्यार आहे.