बोरद येथील शेतकरी दत्तू रोहिदास पाटील यांचे बोरद शिवारात शेत आहे. याठिकाणी त्यांनी यंदा पपईची लागवड केली होती. मंगळवारी सकाळी ते मजुरांसह शेतात गेले असता, परिपक्व होत आलेल्या पपईच्या झाडांची धारदार शस्त्राच्या साहाय्याने कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले. अज्ञाताकडून सुमारे १ हजार ७०० झाडे कापल्याचे मोजणीतून समोर आले. दरम्यान, दहा दिवसांपूर्वीदेखील याच शेतकऱ्याची पपईची ५० झाडे अज्ञात व्यक्तीने कापली होती. तीन एकरातील पपईसाठी शेतकरी दत्तू पाटील यांनी ७५ हजार रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला होता. हा खर्च वाया गेल्याने समस्या निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यातही बोरद येथील जयसिंग चिंधा ठाकरे व बालम तुकड्या पवार यांच्या करणखेडा रस्त्याला असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाचीसुद्धा नासधूस करण्यात आली होती. बोरद पोलीस दूरक्षेत्रात एकाच महिन्यात तिसरी घटना घडल्याने पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
मंगळवारी रोजी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शेतात कुणीही नसल्याच्या अंदाज घेत कृत्य केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कापण्यात आलेली सर्व झाडे ही अर्ध्यातून मोडल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या पथकाने पाहणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश खोंडे, छोटू कोळी, रामोळे, सचिन अहिरे यांनी शेतात पाहणी करून आढावा घेतला.
एप्रिल महिन्यात या पपईची लागवड केली आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या पपईला बऱ्यापैकी फळ व फुलोरा आल्याने चांगल्या प्रकारे उत्पन्न येणार असे दिसून येत होते. दरम्यान, असा प्रकार घडल्याने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अज्ञातांनी हिरावून नेला असल्याचे बोलले जात आहे.
तीन एकर क्षेत्रात तीन हजार रोपांची लागवड केली होती. त्यात मागील आठवड्यात ५० च्या जवळपास पपईच्या झाडांची माथेफिरूने कत्तल केली आणि आता पुन्हा तब्बल दोन झाडांची कत्तल केल्याने पायाखालची जमीनच सरकली. मागील आठवड्यात तळोदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची माहिती शेतकरी दत्तू पाटील यांनी दिली.
दरम्यान, बोरद शिवारात अज्ञात माथेफिरू कडून झाडे कापली जाण्याचे घडणारे प्रकारे हे गंभीर आहेत. अज्ञात व्यक्तीला शोधून कठोर कारवाई करणार आहे. बोरद शिवारात रात्रीची गस्त सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांनी सांगितले.