नंदुरबार : राज्याचे पशुसंवर्धव, दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे शुक्रवार, ५ रोजी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील मृत आंदोलनकर्ती कार्यकर्ती कुटूंबियांच्या सांत्वनासाठी आले. मात्र जिल्ह्यात येऊनही पोल्ट्रीधारक व जिल्ह्यावर बर्ड फ्ल्यूचे गंभीर संकट असतांना त्या प्रश्नाकडे पाठ फिरवत परस्पर रवाना झाल्याने त्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे शुक्रवारी आंबाबारी, ता.अक्कलकुवा येथे शेतकरी आंदोलनातील मृत आंदोलकर्त्या सिताबाई तडवी यांच्या कुटूंबियांच्या सांत्वनासाठी आले. दुर्गम भागातील मृत महिला आंदोलनकर्त्याचा कामाची दखल घेत स्वत: मंत्री आंबाबारी येथे आल्याने त्याबाबत जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असले तरी बर्ड फ्ल्यूचे संकट देखील गंभीर असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी संपुर्ण जिल्हा प्रशासन कशोशिने प्रयत्न करीत असतांना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच नुकसानग्रस्त पोल्ट्री धारकांना दिलासा देण्यासाठी ते नवापूर येथे भेट देतील अशी अपेक्षा असतांना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, आंबाबारी येथे पत्रकारांनी मंत्र्यांना बर्ड फ्ल्यूबाबत छेडले असता त्यांनी याबाबत बर्ड फ्ल्यूने व्यक्ती दगावत नाही. आतापर्यंत एकही व्यक्ती त्यामुळे दगावलेला नाही. कुणी ते सिद्ध केल्यास त्याला बक्षीस देऊ. ७० अंश डिग्री सेल्सीयसपर्यंत मांस शिजवून खाल्यास कुठलाही धोका नाही असे सांगितले. मात्र, नुकसानग्रस्तांबाबत बोलण्यास त्यांनी टाळले.