वाहतूक पोलिसाच्या हातात ई-चलनसाठी मोबाईल देण्यात आलेला आहे. या मोबाईलवरील ॲपवर संबंधित वाहनांच्या क्रमांकाचे छायाचित्र काढल्यानंतर त्या वाहनधारकांच्या मोबाईलवर दंडाचा मॅसेज जातो. परंतु अनेकांना वारंवार आपला मोबाईल बदलण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना आपण नियमांचे उल्लंघन केले आणि त्याला दंड ठोठावण्यात आला, याचीही माहिती नसते. अशाप्रकारे हजारो रुपयांचा दंड त्या वाहनांच्या नावाने थकबाकीत दिसत असतो. त्यामुळे अशा दंडाचे काय? असा प्रश्न आहे.
शहर वाहतूक शाखेकडे ई-चलनसाठी ॲप देण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचारी आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून ठेवतात. त्यानंतर रस्त्यावर कोणत्याही वाहनधारकाने नियम तोडल्यास लगेच त्याचे छायाचित्र काढून दंडाचा मेसेज पाठविला जातो.
या मेसेजमध्ये संबंधित वाहनचालकाने नो-पार्किंग, सिग्नल, भरधाव वेगाने चालविणे, ट्रीपल सीट यापैकी कोणत्या नियमांचा भंग केला, हे ही नमूद असते. तसेच दंड नेमका किती आकारला त्याचीही माहितीही दिली जाते. वाहनधारकाला चूक कळते.
वाहन खरेदी करताना आपला मोबाईल क्रमांक त्यासाठी नोंदणी करावा लागतो. तसेच परिवहन विभागाकडेही आपल्या वाहनाच्या क्रमांकासोबतच तो जोडलेला असतो. परंतु अनेकजण त्यानंतर हा मोबाईल क्रमांक बदलतात. त्यामुळे जुन्याच क्रमांकावर दंडाचे मेसेज जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.