नंदुरबार : उधना-जळगाव मार्गाने धावणाऱ्या कोरोना स्पेशल रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत. या गाड्यांचे तिकीट दर सामान्य प्रवासी गाड्यांपेक्षा वाढीव असल्याने, तसेच त्यात जनरल डबेही आरक्षित असल्याने हाल होत आहेत. दरम्यान, रेल्वेकडून या गाड्या कोरोना संपल्यानंतर बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनवेळा झालेल्या लाॅकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेगाड्यांना मोठा फटका बसला होता. यातून काही काळासाठी रेल्वे वाहतूक बंदही करण्यात आली होती. सध्या रेल्वे सुरळीत सुरू असली तरी प्रवाशांना मात्र स्पेशल रेल्वेत जागा मिळवणे कठीण झाले आहे. विशेष बाब म्हणजे ऐनवेळी आरक्षण केलेल्या रेल्वेही रद्द करण्याचे प्रकार सुरू असल्याने समस्या निर्माण होत आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या गाड्यांतून कोरोनाला अटकाव करण्यात येत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. येत्या काळात देशातून कोरोना हद्दपार झाल्यानंतरच या गाड्या बंद होतील, असे रेल्वेने म्हटले आहे.
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
रेल्वेकडून सुरू असलेल्या स्पेशल रेल्वेगाड्यांचे भाडे सर्वसामान्य गाड्यांपेक्षा दुप्पट असते.
१०० टक्के आरक्षित असलेल्या या गाड्यांमध्ये जागा मिळवणे छोट्या स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांना कठीण होत आहे.
जनरल डबे कधी अनलाॅक होणार
कोरोनामुळे जनरल डब्यात गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. यातून जनरल डब्यात आरक्षण करणे सक्तीचे होत आहे.
पॅसेंजर गाडीतही आरक्षण करण्याची सक्ती केली जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने नियमित रेल्वेचा प्रवास होत होता; परंतु आता गाड्या कमी झाल्या आहेत. आरक्षण मिळत नाही. स्पेशल गाड्यांमध्ये सतत वेटिंग येत असल्याने अडचणी येतात.
-आदित्य वळवी, नंदुरबार,
गुजरातमध्ये सततचे येणे-जाणे आहे. व्यवसायासाठी लागणारा माल आणावा लागतो. ऑनलाईन व्यवहार होत असले तरीही कामानिमित्त जावेच लागते. अशावेळी रेल्वेचे रिझर्व्हेशन मिळत नाही.
-योगेश चाैधरी, नंदुरबार.